शक्तिपीठ महामार्ग हा विकास आहे की विनाश ? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

जालना : एका शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे खरडून गेलेली असताना त्याच्याच उरावर उभे राहून मी काय सांगू, तुझ्या जमिनीवरून शक्तिपीठ महामार्ग नेतोय? हा विकास आहे की विनाश? आज शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आहे. काल एका भागात हे झाले, आज दुसऱ्या भागात होत आहे. प्रत्येकवेळी शेतकऱ्याचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी महामार्गात जात आहेत. या प्रकल्पाची कोणाचीही मागणी नाही. तरीही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. हा प्रकल्प म्हणजे मागणी नसलेली योजना असल्याचे सांगताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची आज शनिवारी जालना येथे सांगता झाली. चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्याची सांगता करताना ठाकरेंनी जालना येथे पत्रकार परिषद घेताना दौऱ्याची संपूर्ण माहितीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरेंनी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

शक्तिपीठ महामार्गासाठी लागणारे सिमेंट तब्बल 12 कोटी बॅग आणि नारळ फोडतानाचे खर्चाचे गणित 86 हजार कोटी रुपये आहे. आता सिमेंट कोणाचा वापरणार हे बघा, मग समजेल की हा मार्ग कोणासाठी आहे. विकास कोणाचा होतोय हे स्पष्ट दिसेल. सिमेंट अदानीचे आहे. मुंबईजवळ कल्याण-डोंबिवली येथे अदानीला सिमेंट कारखान्यासाठी मोठी जमीन देण्यात आली आहे. तिथे प्रदूषणामुळे स्थानिक विरोध करत आहेत. तरी पंतप्रधानांनी नियम बदलून अदानी कंपनीला ती जमीन दिली आहे. म्हणजे सगळं गणित तयार आहे. महामार्ग, सिमेंट आणि लाभार्थी एकाच रेषेत उभे आहेत, असा आरोपच ठाकरेंनी केला आहे.

हा व्यक्तीपीठ महामार्ग

जमिनी गेल्या की माझा शेतकरी भिकेला लागेल. त्याच्या हातात भिकेचा कटोरा यायचा बाकी आहे. हा शक्तिपीठ महामार्ग नाही, हा व्यक्तिपीठ महामार्ग आहे. जमिनी गेल्या, शेतकरी कंगाल झाला आणि त्याच्या विनाशावर काही लोकांचा विकास उभा राहतोय. त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे आणि हा विरोध योग्य आहे. कारण हा मार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे नुकसान करून केलेला विकास म्हणजे विनाश. हा विकास नाही, हा विनाश आहे, असे म्हणत ठाकरेंनी शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला आहे.

The post शक्तिपीठ महामार्ग हा विकास आहे की विनाश ? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!