“एका तेजस्वी यादवच्या पराभवासाठी…”; ‘सामना’तून बिहार निवडणूक निकालावर खळबळजनक दावा; ‘ते’ चार प्रश्न अन्…

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Saamana : बिहार विधानसभेचा निकाला भाजपसाठी उत्साह वाढवणारा आहे. या निकालाने राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार विराजमान होणार आहे. आता सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू होणार आहेत. बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला आहे. नीतीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाने देखील गतपेक्षा या निवडणुकीत मोठ्या जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष धुमधडाक्यात भाजपने साजरा केला आहे. पण बिहार राज्यातील विजयावर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

तो विजयी जल्लोष नसून…. 

बिहारचे निकाल धक्कादायक नसल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करत असल्याचे दिसते, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात घडवून आणले, तेच बिहारमध्ये झाले.  तेजस्वी यादव यांच्या पराभवासाठी पंतप्रधान आणि पाच राज्यांचे मुख्यमंत्री बिहारमध्ये गेले होते, अशी टीका करण्यात आली आहे. देशाची अवस्था गंभीर आणि चिंताजनक आहे. जणू महाभारतावर कौरवांचे अमर्याद राज्य सुरू झाले आहे व त्यास अंत नाही. बिहारच्या विजयाचा जल्लोष, ढोल-नगारे दिल्लीच्या रस्त्यावर वाजवले जातील. तो विजयी जल्लोष नसून भारतीय लोकशाहीची अंतिम यात्रा सुरू झाल्याचा इशारा आहे, असेही अग्रलेखातून म्हटले आहे.

ईव्हीएम आणि इतर मांडणी सर्वत्र त्याच पद्धतीने केलेली दिसते 

महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी सत्तेवर येणार होती, त्या आघाडीस 50 जागाही मिळाल्या नाहीत. बिहारात नितीश कुमार यांचे भंगार सरकार कोमात गेले होते. तेजस्वी यादव आणि त्यांच्या आघाडीने मुसंडी मारली, पण येथेही कोमातल्या सरकारच्या बाजूने म्हणे विजयाची सुनामी आली व तेजस्वी यादव यांचे साफ पानिपत झाले. भारताची लोकशाहीदेखील बिहारच्या भूमीवर मूर्च्छित होऊन पडली आहे. बिहारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीस 180 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. महाराष्ट्रात भाजपला 133 जागा मिळाल्या. एकंदरीत ईव्हीएम आणि इतर मांडणी सर्वत्र त्याच पद्धतीने केलेली दिसते.

बिहारची निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीतला घोटाळा

एका तेजस्वी यादवच्या पराभवासाठी एक पंतप्रधान, पाच राज्यांचे मुख्यमंत्री, 80 मंत्री आणि देशभरातील 400 आमदार-खासदार बिहारात उतरवले गेले. प्रचंड पैसा, प्रशासकीय यंत्रणेचा वापर झाला. बिहारातील 75 लाख महिलांच्या खात्यांत पंतप्रधानांनी दहा हजार रुपये थेट निवडणुकीच्या आधी टाकले व ‘‘पुढचे पैसे लगेच पाठवतो, भाजपला मतदान करा,’’ असे ते महिलांना प्रत्येक सभेत सांगत राहिले. या सगळ्याचा परिणाम बिहारात दिसत आहे. बिहारची निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीतला घोटाळा आहे.

‘ते’ चार प्रश्न 

बिहारात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. ती संधी त्यांना आता मिळत असेल तर नितीश कुमारांना बाजूला करून, त्यांचा पक्ष ताब्यात घेऊन ते मुख्यमंत्रीपद मिळवायला मागेपुढे पाहणार नाहीत. बिहारच्या निकालांमुळे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल? बिहारचे निकाल देशाच्या जनतेला मान्य आहेत काय? बिहारच्या निकालांमधून विरोधकांनी काय बोध घ्यावा? या देशातली लोकशाही, संसद, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांच्या रक्षणासाठी जी लढाई सुरू झाली आहे, त्यास बिहारच्या निकालाने अडथळा निर्माण होईल काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एकत्र बसून शोधावी लागतील, असे सवाल सामनातून विचारण्यात आले आहेत.

हेही वाचा : Bollywood Celebrity Drug Party: बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत! नोरा–श्रद्धाचं नाव समोर; धक्कादायक खुलासा

The post “एका तेजस्वी यादवच्या पराभवासाठी…”; ‘सामना’तून बिहार निवडणूक निकालावर खळबळजनक दावा; ‘ते’ चार प्रश्न अन्… appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!