मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात काँग्रेसकडून मोठी घोषणा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता काँग्रेसने मनसेसोबत युती करणार की नाही, याबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे महाविकासाआघाडीमध्ये मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीसोबत लढणार की एकटे लढणार याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेटपणे भाष्य केले. यावेळी त्यांनी मित्रपक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. आमच्या लोकांनीही तेच ठरवलं आहे. मुंबईची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराची प्रकरणं हजारो आहेत. खिरापत वाटली जात आहे. मुंबईच्या एकूण विकासाला आणि आर्थिक सुबकत्तेला छेद देणारी ही सर्व घटना आणि प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाले आहेत. आताच्या सरकारमध्ये होत आहे. मुंबईत अजूनही पाणी साचत आहे. मुंबईतील नदी नाले अजून स्वच्छ झालेले नाही. अनेक प्रश्न आहेत. मुंबई महापालिका ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी महापालिका आहे. या महापालिकेते जे आवश्यक प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही लढू, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

आमच्या विभाजनाची चिंता कशाला?

मित्रपक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल. शरद पवारांच्या पक्षाकडून जर चर्चेचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करु. मतांचे विभाजन होईल, फायदा होईल, तोटा होईल, आम्ही नेहमी लढत आलो. मुंबई महापालिकेत आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. उलट आमच्या विरुद्ध जे तीन पक्षही सत्तेत वेगळे लढत आहेत. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट हे वेगळे लढणार आहेत. जर त्यांचे विभाजन होत नाही, तर आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अद्याप वेळ आहे. आम्ही सर्वांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करुन जे आमचे समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास त्यांच्याशी चर्चा करु आणि निवडणुकीत आघाडी करण्याच्या शक्यतेबद्दल बोलू. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळायला हवी. अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. अशावेळी ती संधीही मिळेल. जिंकण हा उद्देष नाही. तर कार्यकर्त्याला न्याय देणं हा उद्देश आहे. जर ते मनसेबरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला तर आमचे मुंबईतील स्थानिक नेते आहेत, त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवू त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!